आमच्या पोरास्नी शाळा कसली ठाऊकच नाय...

हे बोल ऐकल्यावर चटकण डोळ्यात पाणी उभा राहिले आणि थोडा वेळ स्थिर झालो. हे बोल आहेत पायाच्या नडग्या वाळेपर्यंत शेळ्या-मेंढ्यांसाठी चाऱ्याच्या शोधात आणि कुटूंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी वणवण फिरून भटकंती करणाऱ्या सुळेवाडी ता.माळशिरस जि.सोलापूर येथील माझ्या मेंढपाळ बांधवांचे. यशवंत युवा सेनेचे मुंबई विभाग प्रमुख मा.तानाजीराजे गोयेकर यांनी चारणीवरून परत निघालेल्या मेंढपाळ बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मेंढपाळ बांधवांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते यांची विचारपूस करून यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य ही संघटना तुमच्या सोबत असल्याचा विश्वास आणि दिलासा दिला.
एकीकडे शासनाने ६-१४ वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था केली असताना देखिल माझ्या धनगर समाजातील मुला-मुलींना मात्र अणवानी पायानं शेळ्या-मेंढ्यांच्या मागे फिरावे लागते ही फार मोठी शोकांतिका आहे. अलिशान एअरकंडीशन गाड्यांतून, स्कूल बसेसमधून शाळेला जाणारी मुले पाहिली की आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना देखिल शाळेला जाण्याची ओढ लागते पण ते आमच्या मुलांच्या नशिबात नसतं त्याचे कारण असे की जी मुले एअरकंडीशनर गाड्यांतून आणि स्कूल बसेसमधून शाळेला जातात त्यांच्याच बापजाद्यांनी चराऊ कुरणे सरकारच्या घशात घातली आणि माझ्या मेंढपाळ बांधवांवरती भटकंतीची वेळ आली. कुठेही रानावनात दऱ्याखोऱ्यांत उन वारा पाऊस यांचा विचार न करता आज इथे तर उद्या तिथे असा प्रवास करत, कोणा शेतकऱ्यांच्या शिव्या/मार खात, गावगुंडांचा आणि गावच्या पाटलांचा त्रास सहन करत काळ्या रानात तीन दगडाच्या चुलींवर स्वयंपाक करून दगडाचे उसे आणि आभाळाचे पांघरूण करून धरती मातेच्या खुशीत निश्चित झोपायला देखिल मिळत नाही कारण जंगलातील हिंस्र पशूपासून शेळ्या-मेंढ्यांचे रक्षण करायला देखिल पहारा करावा लागतो हेच आमच्या मेंढपाळ बांधवांचं जगणं. मग लहानपणापासून आई बापाच्या मागं मागं आयुष्याचा अर्धा संसार आणि करडाकोकरांचं लटांबणं पाठीवर लादलेल्या घोड्याचा लगाम धरून अणवाणी पायानं चालणं हे आमच्या धनगर समाजातील मेंढपाळांच्या मुलांच्या नशिबी असेल तर कधी जाणार आमची पोरं शाळेत? कुठे जाणार ती मुलं दोन-चार शब्द शिकायला? ज्यांच्या राहण्याचा ठाऊठिकाणाच त्यांना माहित नाही तर कोणत्या शाळेत त्यांनी प्रवेश घ्यायचा? इतर समाजातील मुला मुलींना ज्या सुखसोई, शैक्षणिक सुविधा, सवलती मिळतात पण त्या सवलती मात्र माझ्या धनगर समाजातील मेंढपाळांच्या मुलामुलींना उपभोगता येत नाहीत त्याचे कारण म्हणजे भटकंती आमच्या पाचवीलाच पुजलेली आहे.
परवा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे मुंबई विभाग प्रमुख मा.तानाजीराजे गोयेकर यांनी सुळेवाडी गावच्या त्या मेंढपाळ  बांधवांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. मुलांच्या शिक्षणाबद्दल त्यांनी विचारपूस केली असता आमच्या पोरास्नी शाळा कसली ठाऊकच नाय असे त्यांनी स्पष्ट सांगितले. चारणीसाठी बाहेरगावी असताना पाऊस पडला नाही पण गावाकडे थोडाफार पाऊस झाल्याने सर्व कुटूंबकबिला घेऊन घराकडच्या दिशेने निघाल्याचे मेंढपाळ बांधवांनी सांगितले. राष्ट्रपती पुरस्कार विजेता तथा यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे युवक प्रदेशाध्यक्ष मा.शरद गोयेकर दिग्दर्शीत धनगर समाजाच्या ज्वलंत परिस्थीतीवर आधारित बब्या चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून त्या चित्रपटात अभिनय करणारा आपल्याच समाजातील युवक एक सिनेअभिनेता आपल्याशी चर्चा करतोय हे समजल्यावर माझ्या मेंढपाळ बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडून वाहत होता त्यांना फार समाधान देखिल वाटले. मा.तानाजीराजे गोयेकर यांनी यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य या क्रांतीकारी संघटनेबद्दल मेंढपाळ बांधवांना सांगितले की ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या विचारधारेवर मार्गक्रमण करत असून मेंढपाळांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुढे येतोय कधीही गरज लागली, कुठे अन्याय/अत्याचार होत असेल तर हाक द्या यशवंत युवा सेनेचा मावळा या नात्यानं आम्ही तुमच्याजवळ पोहचू असे सांगून मा.तानाजीराजे गोयेकर यांनी आपला संपर्क क्रमांक त्या मेंढपाळ बांधवांना दिला.
यशवंत युवा सेना ही संघटना यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि स्व.बी.के कोकरे साहेबांच्या विचारधारेवर चालत असून आज महाराष्ट्र राज्यात यशवंत युवा सेनेची यशस्वी वाटचाल होत आहे. तरी तळागळापर्यंत वाड्यावस्तीवर ही संघटना लवकरात लवकर पोहोचवून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एका झेंड्याखाली एकत्रित यावे असे आवाहन यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य चे मुंबई विभाग प्रमुख तथा सिनेअभिनेते मा.तानाजीराजे गोयेकर यांनी केले आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
     *✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
         +91 853 000 4123
nitinrajepublications.blogspot.com


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

धुळे येथे वनरक्षक बनलेत भक्षक, ७ सप्टेंबर ला मोर्चा

सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा यशस्वी, २५-५० लाख धनगरांचा उत्स्फूर्त सहभाग

प्रस्तावना : प्राचार्य डॉ शिवाजी दळणर सर